लाखो रुपयांचे नुकसान, सलग दुसरी घटना
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळ असलेल्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आवारात शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी ठेवलेले लाखो रुपयांचे नवीन एचडीपी पाईप जळून खाक झाले आहेत. दोन महिन्यापूर्वी ही याच ठिकाणी आग लागली होती. त्यावेळीही पाईप जळून खाक झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते. या वाळलेल्या गवताला लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि पाईपांच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचली. पाईप ज्वलनशील असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले होते. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने अत्यंत तत्परतेने ‘पाणी आणि फोम’चा वापर करून ही आग आटोक्यात आणली.विशेष म्हणजे, याच ठिकाणी पाईपांना आग लागण्याची ही दुसरी वेळ आहे.
ही जागा सुरक्षित आणि बंदिस्त नसल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी या निष्काळजी पणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.









