तोट्यातील एसटीला मालवाहतुकीचा हात

मालवाहतुकीमधून रत्नागिरी एसटी विभागाला दोन  कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी:- कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी महामंडळालाही बसला. एसटी विभागाची आर्थिक घडी पुरती विस्कटली. ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने २१ मेपासून मालवाहतूक सेवा सुरु केली. या मालवाहतूक सेवेला कारखानदार व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागाला तब्बल दोन कोटीं रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे.

कोरोना महामारीचा मोठा फटका तोट्यात असलेल्या एसटी महामंडळालाही बसला. सहा महिने राज्यातील सर्व एसटी सेवा ठप्प होती. याचा मोठा आर्थिक फटका एसटी सेवेला बसला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि काही एसटीमध्ये संरचनात्मक बदल केले.

एसटी मालवाहतुकीची वैशिष्ट्ये
या मालवाहतूक सेवेला जिल्ह्यातील कारखानदार, व्यापारी, शेतकरी आदींनी पसंती दिली आहे. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागातून ५० मालवाहतूक गाड्यामधून मालवाहतूक केली जात आहे. एसटीने होणारी वाहतूक अधिक सुरक्षित आहे. तसेच प्रशिक्षित वाहनचालकांमार्फत ही सेवा दिली जात आहे, ही सेवा सेवा माफक दरात उपलब्ध असल्याने अनेकांची पसंती या मालवाहतुकीला असल्याचं मेहतर यांनी सांगितलं.