ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजीनामा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर, या निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सादर केला असून, या निर्णयामुळे पक्षांतर्गत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अलीकडील काळात शिवसेना उबाठामधील अनेक पदाधिकारी व नेत्यांनी इतर गटात प्रवेश केला असला, तरी सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंच्या पाठीशी उभा असल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.

ठाकरेंच्या अनेक उमेदवारांचा पराभव काहीशे मतांनी झाला असून, बहुतांश ठिकाणी लढत एकतर्फी होऊ दिली गेली नाही. प्रमुख नेते तालुक्यात सक्रियपणे प्रचारात नसतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘मशाल’ हाती घेत ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. परिणामी रत्नागिरी तालुक्यात ठाकरेंच्या सेनेला सुमारे ४५ हजारांहून अधिक मते मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. यावरून ग्रामीण भागात आजही ‘ठाकरे म्हणजेच शिवसेना’ मानणारा मोठा वर्ग सक्रिय असल्याचे दिसून आले.

तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर घोसाळे यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत तालुक्यात पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन त्यांनी शिवसेनेची होणारी पडझड काही अंशी रोखण्यात यश मिळवले होते. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील पराभव मनाला लागल्याने त्यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना शेखर घोसाळे म्हणाले की, आपण कट्टर ठाकरेप्रेमी असून पुढेही शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत अन्य पक्षात जाण्याचा विचार नाही. तालुक्यातील सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजूने असून, त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे पक्षकार्य सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.