रत्नागिरी:-जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्हा ३ स्तरात सामावेश झाला आहे. जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली असून बुधवारी (ता. २३) यावर निर्णय होईल. कशात किती सवलत दिली जाईल हे जिल्हाधिकारी जाहीर करतील, अशी दिलासादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदते ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते.
ते म्हणाले, तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील, दुसऱ्या लाटेत तरुण तर तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरीत १७३ बेडची लहान मुलांची तीन कोविड संटेर तयार करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या करमनुकीची, शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यामध्ये आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च केले आहेत. आमची परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, या कोविड सेंटरचा उपयोग नाही झाला तरी चालेल. आमचा निधी फुकट जाऊ दे पण तिसरी लाट येऊच नये.
जिल्ह्यात एकही डेल्टा प्लसचा रुग्ण नाही. कन्टेनमेंट झोन केले, परंतु नवीन स्टेन मिळू शकतो या शक्यतेने खबरदारी म्हणून. त्यामुळे जिल्ह्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव झालेला नाही. ज्यानी ही वृत्त प्रसिद्ध केली आहेत. त्यांना कोठुन आणि कोणी माहिती दिली, याची माहिती घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. यामुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यावर निर्बंध लादले जात आहेत.
एक सकारात्मक बाब म्हणजे जिल्ह्याच पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. आज ८.६१ टक्के हा रेट आहे. चाचण्या साडेसात हजाराच्या वर केल्या जात आहेत. त्या तुलनेत हा रेट कमी आहे. तसचे ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्हाही ३ स्तरात आला आहे. जिल्ह्याच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली आहे. बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. मात्र निर्बंध शिथिल केले आणि बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे नागरिकांनी प्रादूर्भाव रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिग आणि सॅनिटायझरचे काटेकोर पालन करावे.









