रत्नागिरी:- शुकवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर झाल्याची घटना घडली.
शुकवारी पहाटे 6.30 वाजता घडलेल्या अपघातामध्ये शैलेश सुनील जाधव (कादवड-चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला रोहित दीपक कदम (19, रा. कादवड-चिपळूण) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. हे दोघेही पहाटे शृंगारतळी येथून आबलोलीकडे येत होते. शिर येथील अवघड वळणावर आले असता दुचाकीचालक जाधव याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याशेजारील काजूच्या झाडावर दुचाकी आदळून अपघात घडला.
या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत आबलोली पाथमिक केंद्रात दाखल केले. मात्र उपचार घेत असतानाच शैलेश जाधव याचा मृत्यू झाला, तर रोहितला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. गुहागर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत.
खेड-कुडोशीनजीक अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
दुसऱ्या घटनेत खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी-जांभुळवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दीपक बाबाजी कदम असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दीपक कदम हे दुचाकीने खेड येथून कुडोशी येथे जात असताना अज्ञात डंपरसारख्या वाहनातून येणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे डोळे दीपल्याने त्यांचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पडून जवळच रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या विद्युतखांबावर आदळले. या बाबत सुनील बाजी कदम यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या अपघाताचा अधिक तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश मोरे करत आहेत.