वातावरणाचा धसका; 15 ऑगस्टचा अनेकांचा मुहूर्त
रत्नागिरी:- वेगवान वारे, खवळलेला समुद्र अशा धोकादायक वातावरणाचा सामना करत मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करत आहेत. बिघडलेल्या वातावरणामुळे पाच टक्केच मच्छीमारी सुरु झाली आहे. एवढं करुनही 30 ते 35 हजारांचीच मासळी जाळ्यात सापडत आहे. त्यात वाढलेल्या डिझेल दरामुळे मच्छीमार त्रस्त असून नफ्यातील बराचसा भाग त्यावर खर्ची पडत आहे.
यंदाच्या मच्छीमारी हंगामाची सुरवात नैसर्गिक संकटातूनच झाली आहे. बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी वेगवान वारे आणि खवळलेल्या समुद्राचा खलाशांना सामना करावा लागला. साखरतर येथील एक नौका भरकटली आणि वरवडे किनारी लागली. इंजिन खराब झाल्यामुळे ती अजुनही तेथेच आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरण अजुनही बिघडलेेले असल्याने अजस्त्र लाटांचा सामना करत मच्छीमार समुद्रावर स्वार होत आहेत. छोट्या नौका आणि ट्रॉलर्स मिळून दहा टक्केच मच्छीमार सध्या मासेमारीला जात आहेत. छोट्या नौकांना बांगडा सापडत असून एका डिशला 5 हजार रुपये दर मिळतोय. चालू कोळंबी, बारीक पापलेट जाळ्यात मिळत आहे. सर्व मिळून सर्व साधारणपणे चार ते पाच डिश मासे मिळत आहेत. साधारण 30 ते 35 हजाराची मासळी दररोज सापडत आहे. एवढा धोका पत्करुन हवी तशी मासळी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. निर्यात सुरु न झाल्यामुळे दरही यथातथाच आहेत.
वेगवान वार्यांमुळे अन्य नौका समुद्रात जाण्यास अजुनही घाबरत आहेत. ज्या नौकांची डोली मजबुत आहे, तेच मासेमारी करत आहेत. अन्यथा वार्यामुळे डोली फाटून 20 हजार रुपयांचा भुर्दंड बसण्याची भिती आहे. ज्यांनी नौका दुरुस्त केल्या आहेत, तेच धोका पत्करुन पुढे जात आहेत. सध्या दहा ते बारा वावात मासे मिळत आहेत. पाच दिवसांनी श्रावण सुरु होत असल्यामुळे माशांची मागणीही घटणार आहे. त्यावेळी दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.









