जिल्ह्यात 488 विद्यार्थ्यांना लागली मोफत शाळा प्रवेशाची लॉटरी

रत्नागिरी:- गेले दीड महिने रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात 97 शाळांमधील 812 जागांसाठी 570 जणांना लॉटरी लागली होती. मात्र या 570 जणांपैकी 21 अर्ज अपात्र करण्यात आले. 61 जण प्रवेश घेण्यासाठी आले नाहीत. यामुळे 488 जणांना प्रवेश देण्यात आला आहे.

शिक्षण विभागाने दि. 7 जून रोजी आरटीईची ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. परंतु, काही खासगी शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी आरटीई कायद्यातील बदल रद्द करावा, याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आणि निकाल देण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिन्यापासून रखडली होती.
गेल्या आठवड्यात 570 जणांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही 61 जणांनी प्रवेश घेतलाच नाही. तर 21 अर्ज अपात्र करण्यात आले. यामुळे 488 जणांनी अंतिम प्रवेश घेतला आहे.