जिल्हाभरात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप 

रत्नागिरी:- ‘गणपती बाप्पा मोरया…पुढल्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी जिल्ह्यात दीडदिवसांच्या गणरायांचे विसर्जन अत्यंत भक्तीभावात झाले. पुढच्यावर्षी लवकर येण्याची साद घालत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी जिल्ह्यात ९ हजार ७७४ बाप्पांना वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

जिल्ह्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धुम आहे. भक्तांच्या अनेक दिवसाची प्रतिक्षा बुधवारी संपुष्टात आली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांच्या घरी दीडदिवसांचा पाहूणचार घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात दीडदिवसांच्या जवळपास दहा हजार घरगुती आणि दोन सार्वजनिक गणेशांचे विसर्जन भक्तीमय वातावरणात झाले. 

श्री गणेश विसर्जनासाठी रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनारी गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली अनेकांनी खासगी वाहनांमधून आपल्या लाडक्या गणरायाला नेत गणेश भक्तांनी विसर्जन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दीडदिवसाच्या गणरायाला शांतपणे निरोप देण्याची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी मांडवी किनारी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

जिल्ह्यात ९ हजार ७७४ खासगी आणि २ सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये रत्नाागिरी शहरातील ४३८ ग्रामीण भागात ११४, जयगड परिसरात २७२, संगमेश्वर ७३६, राजापूर २ हजार ४७५, नाटे ४९२, लांजा १२५, देवरूख २६५, सावर्डे ११५, चिपळूण १०९, गुहागर ६२०, अलोरे २००, खेड ९४३, दापोली १ हजार २०५, मंडणगड ९२४, बाणकोटमध्ये २१५, पूर्णगडमध्ये १३६ आणि दाभोळमधील ३९० गणेशमूर्तीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.