रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती देवून बदली करणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास त्यांचे निलंबन करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे बदल्या पारदर्शक होण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीरही केले आहे. मात्र, एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही बदल्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कामकाज सुरू झाले आहे.
गतवर्षी प्राथमिक शिक्षकांनी विशेष संवर्ग १ मध्ये जाण्यासाठी शक्कल लढवत दिव्यांग व घटस्फोटीत प्रमाणपत्र सादर केले आणि सोयीच्या बदलीचा लाभघेतला होता, असे प्रकार राज्यभरात अनेक ठिकाणी उघडकीस आले होते. मात्र यावर्षीही बदली प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती देवून बदली करणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत कोणी खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास बदलीचा लाभघेता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे घडल्यास तालुकास्तरीय समितीला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.