Wednesday, September 16, 2026
spot_img
Home राजकीय जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके

जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके


रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे. अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या ‘बाळासाहेब ठाकरे’ सभागृहात सोमवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब गलांडे यांनी काम पाहिले.

सकाळी ११:०० वा: उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुपारी १:०० वा: विहित वेळेत अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले. दुपारी ३:०० वा: अर्जांची छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया झाली. दोन्ही अर्ज वैध ठरले आणि विरोधात कोणीही नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली. दुपारी ३:३० वा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

नूतन अध्यक्ष अस्मिता केंद्रे या मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्य आहेत, तर उपाध्यक्षपदी निवड झालेले विलास चाळके यांचा दांडगा प्रशासकीय व राजकीय अनुभव आहे. चाळके यांनी यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले असून, जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ सभापती म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द भूषविली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.