जलप्रवासी वाहतूक रत्नागिरीसह सिंधुदुर्गपर्यंत वाढवणार

भाऊचा धक्का, गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवासी वाहतुकीची चाचणी यशस्वी

रत्नागिरी:- सागरमाला प्रकल्पांतर्गत भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवासी वाहतुकीची चाचणी यशस्वी झाली. आता ही सेवा रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. दळणवळणात महत्त्वाचा भाग असलेल्या जलवाहतुकीमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च आणि वेळ वाचतो. मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत निर्माण केलेला जलवाहतुकीचा सेतू कोकणातील अर्थव्यवस्था आणि पर्यटनवाढीसाठी नवा आयाम ठरु शकतो.

सागरमाला प्रकल्पांतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झाली आहे. मात्र कोकणातील बहुतांश मार्ग खडकाळ असून, अनेक ठिकाणी रेतीसह दलदल-चिखल साचलेलीत आहे. तो काढून या मार्गांचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम झाले तर इंधनात बचत होवून मुंबई-नवी मुंबईसह उरण, अलिबाग व रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ, वेलदूर सारख्या बंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी सुचविलेले नऊ मार्गामध्ये वेलदूर ते दाभोळ, डीसीटी ते काशीद, तोराडी ते आंबवणे,असे रो-रो पॅक्स मालवाहतुकीसाठी सुचविलेले मार्ग आहेत. संबंधित परवानगीची मुदत संपल्याने आता पुन्हा सीआरझेड प्राधिकरणाने एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षे मुदत वाढ मिळाली आहे.

कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमधून जाणारा एकमेव मार्ग होता. रेवस ते रेड्डी असा जाणारा 447 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्गावरील मोठ्या खाड्यांवरील पुलांची कामे रखडल्याने सागरी मार्ग प्रत्यक्षात आला नाही. अलिबाग ते मांडवा आणि रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान सध्या जलप्रवासी वाहतूक केली जाते. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ही जलवाहतूक नियमित सुरू असते. दरवर्षी मांडवा ते मुंबई दरम्यान जवळपास साडेबारा लाख प्रवासी प्रवास करतात. या जलवाहतूक सेवेमुळे पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.

रो-रो सेवेमुळे खर्चासह वेळेची बचत

आगरदांडा ते दिघी, बागमांडला ते वेश्वी, दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ या दरम्यान रो-रो सेवा सुरू झाली आहे. रो-रो जलवाहतूक सेवेमुळे पर्यटकांना त्यांच्या गाडयांसह बोटीतून प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च आणि प्रवासाचा वेळ याची मोठी बचत होत आहे. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ही जलवाहतूक नियमित सुरू असते.