रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 14 सार्वत्रिक तर 134 पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तत्काळ प्रचाराच्या खर्चाचे मीटर सुरु होते. सरपंचपदाच्या उमेदवारांना 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत तर सदस्यपदाच्या उमेदवारांना 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करण्यास मुभा आहे. राज्य निवडणूक आयोगाने खर्चाचे बंधन घातले असले तरी प्रत्यक्षात सरपंचपदाच्या निवडणुकीचा खर्च कमीत कमी 5 लाखांच्या घरात जात आहे.
गेल्या चौदा दिवसांपासून जिल्ह्यातील 148 गावात निवडणुकीचा ज्वर सुरु आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि कार्यकत्यांची धामधूम सुरु आहे. कोणतीही निवडणूक असली की खर्चाचा महापूर सुरु असतो. उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी कितीपर्यंत खर्च करावा, यावर निर्बंध घातलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या बंधनापेक्षा अधिक खर्च झाल्याचे सिध्द झाल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे मतदान होईपर्यंत उमेदवारांच्या खर्चावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नजर ठेवली जाणार आहे.
या पूर्वी 7 ते 17 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रत्येक उमेदवारांना 25 हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करता येत होते. मात्र 21 ऑगस्ट 2017 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे आता 7 ते 9 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील सदस्यपदांच्या उमेदवारांना 25 हजार रुपये, 11 ते 13 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उमेदवारांना 35 हजार रुपये तर 15 व 17 सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उमेदवारांना 50 हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक लढविणार्या उमेदवारांना देखील निवडणूक खर्चाचे बंधन आयोगाने घातले आहे. यापूर्वी थेट सरपंचपदासाठी निवडणुका झाल्या आहेत. कोट्यवधी रुपये निवडणुकीत खर्च केले जातात, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.