Wednesday, August 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी झाला खुला

गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी झाला खुला

रत्नागिरी:- महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल ६० दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २६ जूनपासून समुद्रकिनारा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील धोका कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी किनारा पुन्हा खुला करण्याची मागणी केली होती.

या मागणीवर निर्णय घेण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी केली. त्यानंतर सोमवारी दुपारपासूनच गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

किनारा खुला झाल्याने गणपतीपुळ्यात पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, समुद्रकिनारा खुला झाला असला तरी पर्यटकांनी सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. समुद्राच्या खोल पाण्यात उतरू नये, तसेच जीवरक्षक आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.