रत्नागिरी:-भारताच्या पारंपरिक खो-खो खेळात नव्हे, तर संघात्मक पातळीवर बदल करण्याचे पाऊल भारतीय खो-खो महासंघाने उचलले आहे. त्यानुसार आता नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघात 12 ऐवजी 15 खेळाडू घेण्यास मान्यता दिली आहे.
खो-खो खेळात जसा वेग आहे, तसा धोकाही अधिक आहे. खेळाडू जखमी होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक खेळाडू जखमी झाल्यास पूर्वीच्या 12 खेळाडूंच्या संघरचनेत प्रशिक्षकांसमोर बदली खेळाडूंचे पर्याय कमी असतात. थोडक्यात राखीव खेळाडूंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता खो-खोचा संघ 19 जणांचा राहिल. यात 15 खेळाडू (नऊ खेळणारे आणि सहा राखीव), प्रशिक्षक, व्यवस्थापक, ट्रेनर आणि सपोर्ट स्टाफ अशी संघरचना असेल. महासंघाने केवळ खेळाडूंची संख्या वाढवली आहे. खेळाच्या नियमात आणि खेळण्याच्या पद्धतीत कुठलाही बदल केलेला नाही.
भारतीय खो-खो महासंघाच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या वार्षिक सभेत चंद्रजीत जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. हा बदल का आवश्यक आहे, याबाबत फेडरेशनच्या पदाधिकार्यांनाही पटवून दिले होते. त्यावर विचार विनिमय आणि संलग्न संस्थांची मान्यता घेऊन या बदलाची माहिती भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने सर्व सलंग्न संघटनांना कळविण्यात आली. याची अंमलबजावणी एप्रिल 2022 नंतर होणार्या स्पर्धांमध्ये करण्यात येणार आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजिवराजे निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी फेडरेशनचे सुधांशू मित्तल, सचिव एम. एस. त्यागी यांचे अभिनंदन केले. याबाबत राज्याचे सचिव अॅड. शर्मा म्हणाले की, खेळाडूंसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. दुखापतीवेळी राखीव खेळाडूंची गरज भासते. त्यामुळे संघाला मोठा आधार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचलेल्या खो-खो ला अशाप्रकारच्या निर्णयांमुळे निश्चितच उभारी मिळेल.
खो-खो संघात राखीव खेळाडू कमी होते. हा सगळ्यात वेगवान खेळ आहे. त्यामुळे दुखापत अधिक असते. संघातील वाढलेले खेळाडू संघ हितासाठी फायदेशीर आहे.
–संदिप तावडे, माजी सचिव, राज्य खो-खो संघटना









