रत्नागिरी:- बँक कर्मचा-यांचा संप पूर्णतः यशस्वी सरकारच्या बँक खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात पुकारलेला बैंक कर्मचारी व अधिकारी यांचा दोन दिवसांचा संप पहिल्या दिवशी पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधीनी केला. कोरोनाच्या फैलावामुळे संघटनांची निदर्शने कुठेच झाली नाहीत परंतु, महाराष्ट्रातून बहुसंख्य शहरांतून संपाची भूमिका स्पष्ट करणारी पत्रके संपकरी कर्मचा-यांनी नागरिकांना वाटली.
विद्यमान सरकारने दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकीग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने दिनांक १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. बंदच्या पहिल्या दिवशी देशभरात व रत्नागिरीमध्येही हा संप पूर्णतः यशस्वी झाला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. देशातील बँकींगपैकी जवळपास ७० टक्के व्यवसाय हा सरकारी बँकांमधून हाताळला जातो. नव्वद लाख कोटींच्या आसपास ठेवी व साठ लाख कोटींची कर्ज असा एकूण १५० लाख कोटींचा व्यवसाय आज सार्वजनिक बँकांतून हाताळला जातोय. खाजगीकरणाच्या माध्यमातून व धोरणातून हा व्यवसाय मूठभर कॉपोरेट्सना खुश करण्यासाठी त्यांच्या हाती सोपवणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला ब बैंकींग उद्योगाला परवडणारे नाही. म्हणून बँक बचाओ – देश बचाओ ही घोषणा घेऊन आज बँक कर्मचारी संपावर होते.









