रत्नागिरी:- ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना तसेच एसटी बसला टोल पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, या काळात मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी जात असतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्ग तसेच अटल सेतूवरून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पथकरातून पूर्ण सूट देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच उत्सवाच्या काळातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात असून, आता लाखो भाविकांचा कोकण प्रवास अधिक आनंददायी होणार आहे.









