Friday, July 31, 2026
spot_img
Home राजकीय कोकण विधान परिषदेसाठी अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

कोकण विधान परिषदेसाठी अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत लढत रंगण्याची शक्यता

रत्नागिरी:- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारी (१ जून) अखेरच्या दिवशी पाच प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले. यापूर्वी दाखल झालेल्या एका अर्जासह आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार आमनेसामने आले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंच्या मित्रपक्षांनी आणि नेत्यांनी अपक्ष शड्डू ठोकल्यामुळे या निवडणुकीत ‘आघाडी धर्म’ पाळला जाणार की बंडखोरी उफाळून येणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात शड्डू ठोकला आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज भरून तगडे आव्हान उभे केले आहे.
परंतु, या मुख्य लढतीला आता अंतर्गत बंडखोरी आणि मित्रपक्षांच्या भूमिकेमुळे नाट्यमय वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने (शेकाप) ऍड.मानसी म्हात्रे यांनी अर्ज भरला आहे, तर अरविंद म्हात्रे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, महायुतीमध्येही मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली महेंद्र दळवी यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय, अलिबाग येथील अनिल चोपडा यांनीही अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत वाढवली आहे.

सध्या तरी रिंगणात सहा उमेदवार दिसत असले, तरी येत्या 4 जून रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे या तारखेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. महाविकास आघाडीतील शेकाप आपले उमेदवार मागे घेणार का, तसेच महायुतीतील आमदार महेंद्र दळवी आपल्या कन्येची मनधरणी करून तिचा अर्ज मागे घ्यायला लावणार का, हे 4 जूनलाच स्पष्ट होईल. बंडखोरांनी माघार घेतली नाही, तर अनिकेत तटकरे आणि बाळ माने यांच्यातील थेट लढत अधिक आव्हानात्मक आणि चुरशीची बनणार आहे. त्यामुळे ५ जूननंतरच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीचे खरे चित्र स्पष्ट होईल.