कमी पटाच्या तेराशे शाळांवर बंदची टांगती तलवार कायम

रत्नागिरी:- शासनाच्या समुह शाळा संकल्पनेला विरोध होत असला तरीही त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना आयुक्तस्तरावरुन नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. यासाठी गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत सर्व्हेक्षण करा अशा सुचनाही दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कमी पटाच्या सुमारे तेराशे शाळांवरील टांगती तलवार कायम राहणार आहे. जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्यात प्रत्येकी एक समुह शाळा प्रयोगिक तत्त्वावर सुरु करण्याची तयारी झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाची सुविधा जिल्हा परिषद शाळांमुळे उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खासगी व इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून समुह शाळांची संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले गेले; मात्र याला गावस्तरावरुन विरोध होत आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांचा मोठा आधार आहे. आधीच मुलांना पायपीट करत शाळेत जावे लागत आहे. चार ते पाच शाळा एकत्र केल्यास मुलांची पायपीट वाढणार आहे. यामध्ये मुलांचा शिक्षणाकडील कल कमी होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोध होत आहे. तरीही शासनाने समुह शाळांची संकल्पना राबविण्याचा निर्णय दामटला आहे. दोन दिवसांपुर्वी आयुक्तस्तरावर समुह शाळांच्या संकल्पनेचा आढावा जिल्हानिहाय घेण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून अजुनही एकही प्रस्ताव आलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यात प्रत्येकी एक समुह शाळा सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर तिथे समुह शाळा निर्माण होऊ शकते. याच पध्दतीन अन्य तालुक्यातही समुह शाळा संकल्पना राबविण्यासाठीची यादी तयार करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत सर्व्हे केला जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये तशी यादी तयार करुन शासनाला सादर करावयाची आहे. तशा सुचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 1 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या सुमारे तेराशेच्या दरम्यान आहे. त्यात 1 ते 10 पट असलेल्या 713 शाळा आहेत. समुह शाळांमुळे पट कमी असलेल्या काही शाळांवर बंदची टांगती तलवार निर्माण झाली आहे.