शाळांमध्ये तंबाखु सेवन कारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

जि. प. सभेत अध्यक्ष रोहन बने यांचे आदेश

रत्नागिरी:- तंबाखु मुक्त अभियानांची कडक अंमलबजावणी करण्यावर सभागृहात चर्चा झाली. शाळांमध्ये तंबाखू सेवन करणार्‍यांना सुरवातीला कडक शब्दात समज दिली जाईल. त्यानंतरही वारंवार असे प्रकार झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करा अशा सुचना अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व सभापती आणि सदस्य उपस्थित होते. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना अधिकार्‍यांकडून चुकीची उत्तर दिले जात आहेत. सदस्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत का असा जाब उदय बने यांनी उपस्थित केला. नवोदय महाविदयालाच्या प्रश्‍नावरुन त्यांनी अधिकार्‍यांची उलट तपासणी घेतली. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवडीची यादी प्रसिध्द झाली की नाही, परिजिल्ह्यातून आलेल्या मुलांचा शोध घेतला का, असे प्रश्‍न उपस्थित केले. यावर अधिकार्‍यांनी काम सुरु असल्याचे उत्तर दिले. अध्यक्ष रोहन बने यांनीही शिक्षणाधिकार्‍यांनी नवोदय विद्यालयातील प्रवेशाचा विषय गांभिर्याने घेऊन कार्यवाही करावी असे आदेश दिले.

शिक्षकांकडून होत असलेल्या गैरप्रकारांची अधिकारी गांभिर्याने दखल घेत नाहीत अशी तक्रार संतोष गोवळे यांनी केली. मंडणगडमध्ये झालेल्या प्रकारांची त्यांनी उदाहरणेही दिली. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्‍न उपस्थित केला.

शाळेच्या परिसरात 100 मीटरमध्ये गुटखा, तंबाखु विक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकारी मुख्याध्यापकांना आहेत. त्याची गांभिर्याने दखल घेऊन दंडात्मक कारवाईसाठी पावले उचलावीत अशा सुचनाही त्यांनी दिल्या. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून केली जाणारी कामे कमी दराने घेतली जातात. त्यामुळे ठेकेदार निकृष्ट दजार्च काम करतात. त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी संतोष थेराडे, संतोष गोवळे यांनी केली. त्यावर अध्यक्ष बने यांनी संबंधित कामांची तपासणी करावी अशा सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या.

लांजा-पुनस रस्ता दुरुस्तीचे काम करताना बांधकाम विभागाकडून फक्त खडी टाकून ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तिन महिन्यापुर्वी आवाज उठवला होता. त्यानंतर हे काम सुरु केले आहे. दुरुस्तीची कामे अशीच कुर्मगतीने सुरु राहीली तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल अशा शब्दात स्वरुपा साळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तडकावले. याप्रसंगी उपस्थित अधिकार्‍यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करुन असे आश्‍वासन दिले. बांधकाम विभागाच्या कामाकाजाबद्दल सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केला.
तसेच शॉटसर्किटमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकर्‍यांना भरपाई दिली जात नाही. त्यावरही तत्काळ निर्णय घ्यावा अशी सुचना सदस्यांनी केली. तसेच महावितरणकडून कृषी पंप बसविण्याचे काम किती पूर्ण झाले याची माहिती सभागृहात सादर करावी अशी मागणी संतोष गोवळेंनी केली. मार्चअखेरपर्यंत अडीचशे जोडण्या पूर्ण करु असे आश्‍वासन मागील सभेत दिले होते. मात्र याची माहिती अधिकार्‍यांना सभागृहात सादर करता आली नाही. पुढील सभेत कामांची माहिती देऊ असे सांगितले.