रत्नागिरी:- बोटीवर काम करत असताना अचानक चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रकाश दत्ताराम साळवी (वय ४८, रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) सकाळी सव्वा आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश साळवी हे जहांगीर मुल्ला यांच्या बोटीवर कामाला असताना त्यांना अचानक चक्कर आली. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









