रत्नागिरी:- रत्नागिरी ते मुंबई दरम्यान सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही सेवा केवळ कागदावर किंवा घोषणेपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला अनेक कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक टप्प्यांतून जावे लागणार आहे. ही सेवा प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, यावर आता संपूर्ण लक्ष केंद्रित केले जात आहे.
या प्रकल्पातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या आगामी बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणे. बोर्डाचे स्वतंत्र संचालक मंडळ असल्यामुळे या प्रस्तावाला कायदेशीर मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर सागरी महामार्गावर सी-प्लेन उतरवण्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे तांत्रिक बाजू तपासणे. समुद्रातील पाण्याचा प्रवाह, वाऱ्याचा वेग, भरती-ओहोटीचे गणित आणि विमानांच्या लँडिंग व टेक-ऑफसाठी सुरक्षित असणारी जागा शोधणे या अत्यंत क्लिष्ट गोष्टी आहेत. यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन एक सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जाणार आहे.
तांत्रिक बाजू तपासण्यासोबतच या प्रकल्पाची व्यावसायिक व्यवहार्यता तपासणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून एका विशेष सल्लागाराची नेमणूक केली जाईल. हा सल्लागार सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा नेमका प्रतिसाद कसा असेल, याचे सर्वेक्षण करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रवासाचे तिकीट दर किती असावेत, जेणेकरून ते पर्यटकांच्या खिशाला परवडणारे असतील आणि सेवा चालवणाऱ्या कंपनीलाही फायदेशीर ठरतील, याचा आर्थिक ताळमेळ सल्लागाराला बसवावा लागणार आहे. या सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष विमान सेवेचे वेळापत्रक आणि मार्ग निश्चित होतील.
मेरीटाईम बोर्डाच्या नियोजन विभागाचे अधिकारी प्रदीप बढये यांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या तयारीला गती आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोषणा जरी झाली असली, तरी आता खऱ्या अर्थाने तांत्रिक चाचण्या, सल्लागाराचा अहवाल आणि परवानग्या मिळवण्याचे मोठे काम प्रशासनासमोर असणार आहे. हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतरच रत्नागिरीच्या समुद्रावरून सी-प्लेन हवेत झेप घेऊ शकणार आहे.









