बेकायदेशीर उत्खननामुळे भूस्खलनाचा धोका वाढला
दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील राजवाडी परिसरावर पुन्हा एकदा निसर्गाचा आणि मानवनिर्मित चुकांचा मोठा घाला पडण्याची भीती निर्माण झाली आहे. डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे येथील सुमारे 60 कुटुंबांच्या जीवित आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि हे उत्खनन थांबवून परिसराची भूवैज्ञानिक पाहणी करावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
राजवाडी परिसरातील नागरिकांच्या मनात भीती असण्याला एक अत्यंत वेदनादायक पार्श्वभूमी आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये याच राजवाडी परिसरात अत्यंत भीषण भूस्खलन झाले होते. त्या दुर्घटनेत दोन घरे थेट दरडीखाली गाडली गेली होती आणि 8 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या भीषण अपघाताच्या जखमा आणि आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत. असे असतानाही पुन्हा त्याच डोंगराशी खेळ सुरू असल्याने स्थानिक लोक प्रचंड धास्तावले आहेत.
सध्या डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या उत्खननामुळे संपूर्ण डोंगराची स्थिरता धोक्यात आली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आधीच कोकणात मुसळधार पाऊस पडतो, अशा स्थितीत पोखरलेल्या डोंगराची दरड कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सध्या रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने कथित बेकायदेशीर उत्खननाची तातडीने चौकशी करावी, डोंगर पोखरणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि या संपूर्ण संवेदनशील भागाचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 2010 सारख्या मोठ्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणेवर राहील, असा थेट इशाराही आता ग्रामस्थांनी दिला आहे.









