बसरा स्टार जहाज काढणार भंगारात

मिर्‍यात चार महिने अडकले ; सर्व्हेनंतर निर्णय

रत्नागिरी:- मिर्‍या किनार्‍यावर अडकलेल्या बसरा स्टार या इंधनवाहू जहाजाचा दक्षिण आफ्रिका ते शारजा-दुबई हा समुद्री प्रवास अखेरचा ठरला आहे. आज या जहाजाला किनार्‍यावर अडकून 4 महिने पूर्ण झाले. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या सर्वेअरनी केलेल्या सर्व्हेनंतर हे जहाज भंगारात काढण्याचा एजन्सीचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिशय सुरक्षितपणे जहाजाची मोडतोड करून किनारा रिकामा केला जाणार आहे.

बसरा स्टार जहाज इंधन घेऊन दक्षिण आफ्रिकेहून शारजा-दुबईला जात होते. सुमारे 25 हजार रिटर डिझेल या जहाजात होते; मात्र ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा इशारा मिळाला आणि हे जहाज आश्रयासाठी बंदर विभागाची परवानगी घेऊन नर्मदा जेटीला लावण्यात आले होते. जहाजावर तेरा क्रू होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न होता. 3 जूनला वादळाचा कोकण किनार्‍याला जोरदार फटका बसला. या तडाख्यामध्ये जहाजाचा अँकर तुटला आणि जहाज समुद्रात भरकटले. अजस्र लाटांचा मारा खात ते मिर्‍या किनार्‍याला लागले. तेव्हा तेरा क्रू जहाजावर होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला; मात्र बंदर विभाग, स्थानिक, पोलिस आदींनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांची सुटका केली. त्यानंतर जहाजावरील ऑइल आणि डिझेलच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. गळती लागल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑइल किंवा डिझेल पाण्यात मिसळून किनारा दूषित होण्याची भीती होती; मात्र 25 हजार लिटर डिझेल आणि 35 ते 40 बॅरल ऑइल काढण्यात आले. त्यामुळे किनारा सुरक्षित आहे. परंतु जहाज काढण्याबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. अखेर बंदर विभागाने एजन्सीच्यामागे तगादा लावल्यानंतर त्यावर निर्णय झाला. दुबई येथील बसरा स्टार कंपनीच्या अधिकार्‍यांनी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून जहाजाबाबत निर्णय घेतला. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्याचा नुकताच सर्व्हे पूर्ण झाला. सर्व्हेअरचा अहवाल गेल्यानंतर एजन्सीने जहाज दुरुस्तीवर अवाच्या सव्वा खर्च करण्यापेक्षा ते भंगारात काढण्याचा निर्णय झाला आहे. बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. त्यामुळे बसरा स्टार जहाजाचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे.