पाचल:- ओणी-पाचल मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितेश चिमाजी साळवी (रा. हरळ, ता. राजापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ४ जुलै रोजी दुपारी १२.३५ च्या सुमारास पाचल बाजारवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
निलेश साळवी आपल्या एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना, पाठीमागून आलेल्या एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात साळवी गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच विनायक लिंगायत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी साळवी यांना उपचारासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या मदतकार्यात संतोष गांगण, सुभाष शेटे, महादेव शिंदे आणि दामाजी पांचाळ यांनी सहकार्य केले. प्रकृती चिंताजनक असल्याने साळवी यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताप्रकरणी पिकअप चालक प्रदीप कमलेश कनोजिया याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक या घटनेचा पुढील तपास करत आहेत.






