सदस्यांची संख्या २१ वरून २५ होणार
सहकार क्षेत्राला मिळणार बळकटी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारात आणि निर्णय प्रक्रियेत अधिक व्यापकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या आता २१ वरून २५ करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महाराष्ट्र शासनाने या दरवाढीला अधिकृत मान्यता दिली आहे.
मंत्रालयातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ३० जून २०२६ रोजी एका पत्राद्वारे ही माहिती जाहीर केली. सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था, पुणे) यांनी १९ मे २०२६ रोजी शासनाकडे यासंदर्भात एक प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७३ ‘अअअ’ मधील तरतुदींनुसार शासनाला प्राप्त असलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून ही मान्यता देण्यात आली आहे. या वाढीव ४ सदस्यांमुळे बँकेच्या संचालक मंडळात वेगवेगळ्या क्षेत्रांतील व घटकांतील प्रतिनिधींना अधिक वाव मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आणखी बळकटी मिळेल.
शासनाचे कक्ष अधिकारी सुधीर विष्णू अमृते यांच्या स्वाक्षरीने हे मंजुरीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, या निर्णयाची प्रत पुढील माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या आर्थिक आणि सहकार वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत असून, यामुळे बँकेच्या कामकाजाचा विस्तार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल अशी चिन्हे आहेत.









