रत्नागिरी:- कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्दैवी घटनेत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्यरात्री लागलेल्या या आगीत येथील नारायण कृष्णा चव्हाण यांचे फर्निचरचे दुकान, गणेश सुरेश सागवेकर यांचे मोटारसायकल गॅरेज आणि संकेत चंद्रकांत भुते यांचे महा-ई-सेवा केंद्र आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि तिन्ही दुकानांना कवेत घेतले. आगीची तीव्रता इतकी होती की, दुकानातील फर्निचर, दुचाकी दुरुस्तीचे साहित्य, कॉम्प्युटर आणि महत्त्वाचे कागदपत्रे असा सर्वच माल क्षणात जळून खाक झाला.
स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने भीषण रूप घेतल्याने दुकानातील मालाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या तिन्ही व्यावसायिकांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले आहेत.









