‘लाचलुचपत’कडून मालमत्तेची चौकशी करण्याबाबत पत्रव्यवहार
रत्नागिरी:- कोकणच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याबाबत पत्र पाठवले आहे. मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नाईक यांनी कणकवली येथे २००२ आणि २००६ साली दोन दुकान गाळे खरेदी केले होते. या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयाकडून २०२२ पासून चौकशी सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची तपासणी सुरू असून आता त्यात अधिक वेग आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या चौकशीवर बोलताना वैभव नाईक यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, गेली पाच वर्षे त्यांच्या विरोधात चौकशी सुरू असून त्याच कालावधीत इतर अनेक व्यक्तींच्या चौकशा बंद झाल्या आहेत. मात्र त्यांचीच चौकशी कायम ठेवण्यात आली आहे. कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगत त्यांनी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात आपली बाजू कायदेशीर मार्गाने मांडणार असून अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









