रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज-जुनामठ येथील रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी पलायन करणाऱ्या संशयित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता.११) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावरिल नाणीज-जुनामठ येथे घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रकाश शांताराम कांबळे (वय ३६, रा. दाभोळे खुर्द, बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे सोमवारी त्यांची रिक्षा (क्र. एमएच-०८ ए क्यू ८८६६) ही दाभोळ येथून त्यांच्या वाडीतील प्रियांका दिपक कांबळे व जान्हवी दिपक कांबळे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे घेऊन येत असताना त्यांच्या पुढे जाणारा ट्रक्टर (क्र. एमएच-०९ सीजे ७८३१) वरिल चालकाने ट्रक्टर अचानक थांबविल्याने मागून येणारी रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक लागल्याने अपघात झाला. यामध्ये प्रवाशांसहित रिक्षा चालक प्रकाश कांबळे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी महिला प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात घडताच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले होते. या प्रकरणी राजेंद्र शांताराम कांबळे (वय ४३, रा. दाभोळे खुर्द, बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित फरार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









