Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सूचना

रत्नागिरी:- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार नसतील, त्यांना काळ्या यादीत टाका. अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलजीवन मिशन, जयगड, शिरगाव, राजापूर प्रादेशिक जलजीवन मिशन योजनेसंदर्भात आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतला. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, साहायक जिल्हाधिकारी डाॕ जास्मीन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी श्री. सुर्वे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण केले. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, ज्याठिकाणी जागेबाबत अडचणी निर्माण होतील, त्या ठिकाणी ग्रामस्थ, प्रांत यांना सोबत घेवून मार्ग काढावा. ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांचे समाधान करावे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असतील, तेथे कठोर निर्णय घ्या. पोलीसांची मदत घेवून कारवाई करा.

गार्डीयन मिनीस्टर वॉर रुम
गार्डीयन मिनीस्टर वॉर रुमची स्थापना करण्यात येत असून, यामधून दर 15 दिवसाला प्राधान्याने विकासात्मक प्रकल्पांचा, कामांचा आढावा घेतला जाईल. त्यामधून संबंधित अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली जाईल. रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी ही वॉर रुम असेल, असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
ग्रामीण पाणी पुरवठा, जलजीवन मिशनमधील योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातंर्गत विकास कामे याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.