Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’; अपहृत दोन अल्पवयीन मुलींची सुटका

रत्नागिरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’; अपहृत दोन अल्पवयीन मुलींची सुटका

रत्नागिरी:- मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईत, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसमधून या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.
मिळालेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक विशेष पथक तातडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रवाना झाले. नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर येताच पोलिसांनी रेल्वेच्या डब्यांची कसून तपासणी केली. यावेळी त्या दोन्ही अपहृत मुली पोलिसांना मिळून आल्या. ही कारवाई पूर्णपणे गोपनीय आणि वेगाने करण्यात आल्याने मुलींची सुरक्षित सुटका करणे शक्य झाले.

मुलींची सुटका केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे अपहृत मुलींच्या पालकांनी आणि मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय आंबेकर, पोहेकॉ दिपराज पाटील मपोहेकॉ स्वाती राणे या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.