रत्नागिरी:- कोविडमुक्त जिल्हा करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत गृहभेटीद्वारे 14 लाख 22 हजार 213 लोकांची ऑक्सीजन पातळी आणि तापमान याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालयाची 564 पथके तयार केली आहेत.
गेल्या दोन आठवडयांत कोविड रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिम राज्यभरात राबवली जात आहे. शहर, गाव, वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी, अतितिव्र स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना उपचार देणे, प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देणे या गोष्टी करण्यात येणार आहेत. ही मोहिम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत होईल. या पथकात 1 आरोग्य कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले 2 स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. प्रत्येक घरातील सर्व सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे आदी कोवीड सदृश्य लक्षणे आहेत का याची तपासणी करणे, अत्यावश्यक वाटल्यास कोवीड चाचणी करुन पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 4 लाख 27 हजार 773 कुटूंबे असून लोकसंख्या 14 लाख 22 हजार आहे. पाच शहरांमध्ये कुटूंब संख्या 54 हजार 026 इतकी आहे. त्यांच्या तपासणीसाठी ग्रामीण भागात 492 तर शहरात 72 पथके नियुक्त केली जाणार आहे. ही पथके कोमॉर्बीड असलेले रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल, आवश्यक तेथे औषधेही पुरवण्यात येईल. प्रत्येक 10 पथकामागे 1 डॉक्टर उपचारासाठी कार्यरत आहेत. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीशः प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगण्यात येणार आहेत. लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात ही आरोग्य पथके नियुक्त केली जातील. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी विकार आदी आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन दिला जाणार असून प्रत्येक तालुक्यात 1 ताप उपचार केंद्र सुरु केले जाईल.








