भाजपला ९ तर राष्ट्रवादीला २ जागा सोडण्याची शक्यता
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रत्नागिरीत घेतलेल्या मॅरेथॉन बैठकीत शिवसेनेची रणनीती स्पष्ट केली आहे. ५६ पैकी किमान ४५ जागांवर शिवसेना ठाम असून, भाजपला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला केवळ २ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरी आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असल्याने, या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. येथे भाजपला एकही जागा सोडली जाणार नाही. तथापि, गुहागरमध्ये ५ आणि संगमेश्वरमध्ये २ अशा एकूण ७ जागा भाजपला सोडण्याबाबत प्राथमिक सहमती झाली आहे. संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर सामावून घेण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या ११२ जागांपैकी सुमारे ७५ जागांवर शिवसेनेने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, गावखडी आणि वाटद हे तीन गण भाजपला सोडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालकमंत्री सामंत यांनी नाणिज गणातून डॉ. पंकजा कांबळे यांची शिवसेनेच्या पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
पालकमंत्री सामंत यांनी गुरुवारी रत्नागिरीत ठाण मांडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन रणनीतीवर चर्चा केली. रवींद्र चव्हाण दोन दिवसांत रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, त्यानंतर युतीची औपचारिक घोषणा आणि अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीची मोर्चेबांधणी सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) गटानेही जोरदार प्रतिआव्हानाची तयारी केली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी स्पष्ट केले की, उबाठा गटाच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली असून येत्या दोन दिवसांत ती जाहीर केली जातील. रत्नागिरी तालुक्यात तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचे सत्र सुरू आहे.









