रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. खेडशीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांचे घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला असून रोज रात्री 12 ते 4 या वेळेत बिबट्या या परिसरात येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी वनविभागाकडे करूनही यावर अद्याप पावले उचलण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या भागात गवा रेड्यांचा वावर देखील आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न अजून सुटलेला नसतानाच, आता चक्क पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची भर पडली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात बिबट्या या परिसरात आढळून आला होता. बिबट्या एका नागरिकाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, त्याने अंगणात झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला भक्ष्य बनवले होते.
आता खेडशीच्या माजी सरपंच जान्हवी घाणेकर यांचे घरी बसवलेल्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला आहे. दररोज रात्री 12 ते पहाटे 4 या कालावधीत बिबट्याचा या परिसरात मुक्त वावर सुरू असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. डफळचोळ वाडीतील अनेक तरुण एमआयडीसी परिसरात कामाला आहेत. त्यांची दुसरी शिफ्ट (सेकंड शिफ्ट) सुटण्याची वेळ ही मध्यरात्रीची असते. अशा वेळी बिबट्या आणि गवा रेड्यांचा मुक्त संचार पाहता, हे तरुण रोज जीव मुठीत घेऊन घरी परतत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे रात्री-अपरात्री बाहेर पडणे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे.
ग्रामस्थांनी तातडीने संबंधित वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थानी वन विभागाने केली होती. मात्र ग्रामस्थांच्या या मागणीकडे वन विभागाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला.









