रत्नागिरी:- मद्यपान करुन बोटीवरुन निघून गेलेल्या खलाशी मिरकरवाडा जेटी येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. समित तेजराम चौधरी (वय २१, रा. मंगरागाव, जि. कैलाली. सध्या रा. मिरकरवाडा जेटी-रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समित चौधरी वैभवी खेडेकर यांच्या मिनाक्षी बोटीवर काम करत होता. तो गावी जाणार आहे असे बोलत होता. त्याबाबत त्यांच्या वडिलांनाही कळविण्यात आले होते. वडिलांनी नेपाळला पोचला की कळवितो असेही सांगितले होते. मात्र सोमवारी समित चौधरी याने मद्यपान करुन बोटीवरुन निघून गेला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिरकरवाडा जेटी-क्र. १ येथे समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









