रत्नागिरी:- ज्या रात्री घरात आनंदोत्सव साजरा झाला, त्याच रात्री एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. बारशाचा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री झोपलेल्या बालकाचे अंग पहाटे अचानक थंड पडले आणि त्याच्या नाकातून रक्त आले. पालकांनी अनेक खाजगी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची खबर बाळाचे वडील अनिकेत प्रमोद नार्वेकर यांनी २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत नार्वेकर यांच्या घरी मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नातेवाईकांनी एकत्र येऊन बाळाचे नामकरण ‘नीरव’ असे केले. रात्री बारशाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. यावेळी बाळ नीरव पूर्णपणे चांगला खेळत होता.
रात्री २ वाजण्याच्या सुमारास अनिकेत नार्वेकर यांच्या पत्नीने बाळ नीरव याला अंगावरील दूध पाजून त्याला घरातील बेडवर झोपवले आणि त्या शेजारी झोपल्या. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली असता, त्यांनी पाहिले की बाळ नीरवचे अंग अचानक थंड पडले होते आणि त्याच्या नाकातून रक्त आलेले होते.
हा प्रकार पाहून घाबरलेल्या आईने त्वरित कुटुंबातील नातेवाईकांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला घेऊन प्रथम माळनाका येथील डॉ. सूर्यगंध यांच्याकडे, तेथून परकार हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर साळवी स्टॉप येथील डॉ. चौधरी यांच्याकडे धाव घेतली. चौधरी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी बाळाला पुढील उपचारांसाठी तातडीने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार, बाळ नीरव याला रिक्षाने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर बाळ नीरव याला पहाटे मृत घोषित केले.
या अत्यंत दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात आ.मृ. क्र. ११३/२०२५, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









