रत्नागिरी:- ग्रामविकास विभागाने सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत आता महा ई सेवा केंद्र सुरू होणार आहे. नागरिकांना दाखले, उतारे यासह अनेक सेवा आपापल्या गावामध्ये मिळणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतीमध्ये अशाप्रकारची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ग्रामपंचायतींच्या मालकीची ही केंद्रे असतील. कोणाही खासगी व्यक्तीला न देता ग्रामपंचायतीने हीं केंद्रे चालवावीत असे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतीमध्ये केंद्रे सुरू झाल्याने लोकांना दाखले, उतारे यासारख्या विविध प्रकारच्या सुविधांसाठी गावाबाहेर जावे लागणार नाही. काही बाबतीतील परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र आदी दस्तऐवज नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध होतील.
याशिवाय जिल्ह्यात खासगी केंद्र चालकांसाठी डिसेंबरमध्ये एक जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार १४८ जागांकरीता अर्ज मागवण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला ४९७ अर्ज प्राप्त झाले. यापैकी, १०६ जागांसाठी दाखले मान्यताप्राप्त यादी प्रसिद्ध झाली आहे. केंद्र मंजूर झालेल्या लोकांचे आयडी तयार करण्यासाठी मंत्रालय पातळीला शिफारस झाली आहे. येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होऊन खासगी महा ई सेवा केंद्र चालक आपापली केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतील..
२१ ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेथे केंद्रे कार्यरत होऊ शकत नाही. याशिवाय २१ जागांवर आलेले सर्वच्या सर्व अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ४२ ठिकाणी केंद्र सुरू होऊ शकणार नाही. शाळांच्या पातळीला विद्यार्थ्यांची आधार जोडणी करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने आग्रही भूमिका घेतली आहे. अनेक शाळांमध्ये हे काम मार्गी लागले आहे. तथापि १०० टक्के स्वरूपात काम पूर्ण होण्यासाठी शाळा स्तरावर शिबिरे आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
शाळांमध्ये आधार जोडणी शिबीर
शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे की, प्रत्येक तालुक्यात शाळांमध्ये आधार जोडणी शिबीर आयोजित करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी. जेथे आवश्यक तेथे आधार केंद्र चालक अशा शिबिरांना उपस्थित राहून आधार जोडणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करतील. विविध बँकांमध्ये आधार केंद्रे कार्यरत आहेत. त्याची मदत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी नक्की होऊ शकेल.









