पाच महिन्यानंतर एसटीने ओलांडली जिल्ह्याची वेस 

रत्नागिरी:- मार्चपासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गुरुवार २० ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात आली. रत्नागिरी आगारातून कोल्हापूर व सांगली मार्गावर तब्बल ५ महिन्यांनंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतूक सुरु झाली.  

गुरुवार पासुन ४ फेऱ्या सुरु होणार आहेत. याकरिता ई पासची आवश्यकता नसल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी झाली. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे यापार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारातून गुरुवार पासून आंतर जिल्हा वाहतूक सुरु झाली. पहिल्या टप्प्यात ४ फेऱ्या या कोल्हापूर-सांगली मार्गावर सुटणार आहेत. पहाटे ५ च्या सुमारास पहिली फेरी कोल्हापूर मार्गावर सुटली. आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाल्याने प्रवासी मात्र चांगलेच सुखावले आहेत.