रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा येथे एका तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री ९ ते २६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. रबीउल इद्रीसअली इस्लाम (वय ३८, मूळ रा. राजापूर, जि. मालदाह, पश्चिम बंगाल, सध्या रा. हातखंबा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रबीउल हा दारूचा व्यसनी होता. घटनेच्या रात्री तो दारू पिऊन राहत्या खोलीतून बाहेर गेला आणि परत आला नाही. त्यामुळे त्याच्या साथीदारांनी त्याचा शोध सुरू केला. शोधादरम्यान, प्रशांत कदम यांच्या हातखंबा कदमवाडी येथील आंब्याच्या बागेत एका झाडाच्या फांदीला त्याने पुलाच्या कामावरील दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेला आढळला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक तपासात मयत हा दारूच्या नशेत असताना त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.