जिल्हा नियोजन मंडळाला ४०६ कोटींचा निधी

चिपळूण:- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठी २० हजार १६५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्याला ४०६ कोटी रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला किती निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे, त्याची माहिती राज्य सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ४०६ कोटींचा निधी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२ कोटींची मंजुरी मिळाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाला ३६० कोटी रुपये मंजूर झाले होते. हा निधी राज्य सरकारकडून १०० टक्के प्राप्त झाला आणि त्यातून जिल्ह्यातील विकासकामे झाली. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना राबवली. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाला यावर्षी निधी कमी येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना मोजक्याच कामांचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती.