चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या अडीच हजार फेऱ्यांचे नियोजन

रत्नागिरी:-  जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू असून, चाकरमानी आनंदात आहेत. दीड दिवसांच्या बाप्पांचे काल थाटात विसर्जन झाले असून आता गुरुवारी (ता. १२) गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील, त्याकरिता एसटी महामंडळाने जादा फेऱ्याद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्यासाठी जवळपास २५५३ फेऱ्याचे नियोजन केले आहे, माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई, बोरिवली, ठाणे आदी भागांतून २००९ जादा फेऱ्यांमधून चाकरमानी दाखल झाले. महामार्गावरून प्रवासाला वेळ लागला तरी भक्तांची नेहमी एसटीला पसंती असते. त्यामुळे आता चाकरमान्यांच्या परतीसाठीही एसटीने जादा फेऱ्यांची व्यवस्था केली आहे.

गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. १२ सप्टेंबरला १८७ बसेस, १३ ला ८३२, १४ ला सर्वाधिक म्हणजे ९२९ सोडण्यात येणार आहेत. १५ सप्टेंबरला ३३१, १६ ला १०८, १७ ला ७७ आणि १८ ता ८० फेऱ्या सोडल्या जातील. १९ व २० लासुद्धा फेऱ्या सोडण्यात येणार असून, त्याचे आरक्षण सुरू आहे. या परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येक आगारात अन्य आगारांतून आलेल्या जादा एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच त्या त्या आगारांच्या बसेसचा उपयोग केला जाणार आहे. बाहेरील आगारातून आलेल्या ७३५ बसेस व जिल्ह्यातील १०८ वसेसच्या माध्यमातून २५५३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व चालक, वाहकांना आणि आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक, स्थानकप्रमुख आदीना परतीच्या प्रवासाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.