जिल्ह्यात 8 हजार 171 विद्यार्थ्यांनी दिली पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा

रत्नागिरी:- पूर्व उच्च प्राथमिकच्या इयत्ता पाचवी व माध्यमिकच्या इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परिक्षा रविवारी सुरळीत आणि शांततेत पार पडली. पाचवीच्या 8 हजार 171 आणि आठवीच्या 5 हजार 110 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमा़र्फत घेण्यात येणारी या परिक्षेला स्पर्धा परीक्षेइतकेच अलिकडे महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ पहायला मिळत आहे. राज्यात एकाच दिवशी ही परीक्षा पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी)1 हजार 797 शाळांमधील 5 हजार 137 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 5 हजार 110 विद्यार्थी परिक्षेसाठी हजर होते. परीक्षेसाठी 49 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) 1 हजार 797 शाळांमधील 8 हजार 186 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 8 हजार 171 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. 91 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात शिष्यवृत्ती परिक्षेसाठी गतवर्षीपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी 2023 मध्ये 4 हजार 794 विद्यार्थी बसले होते. यावर्षी 2024 साठी मात्र ही संख्या 5 हजाराच्या घरात गेली आहे.