रत्नागिरी:- जिल्ह्यातील बारा ग्रामीण यात्रास्थळांचा विकास करण्यासाठी 1 कोटी 42 लाख रुपये ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झाले आहेत. मात्र, मंजूर झालेल्या कामांपैकी सहा कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतींनी सादर केलेले नसल्याने प्रशासनाने नियोजन विभागाकडील निधी प्रलबित ठेवला आहे. त्यामुळे प्रस्तावाअभावी प्रस्तावित यात्रास्थळांचा विकास रखडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागातील यात्रास्थळांचा विकास होण्यासाठी त्या-त्या यात्रा स्थळांच्या परिसरातील ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन जिल्ह्यातील 12 कामे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूर कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे अद्याप मंजुरीसाठी आलेले नाहीत. ग्रामपंचायतींना वेळोवेळी ते प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतीने ही बाब गांभिर्याने न घेतल्याने प्रशासकीय मान्यता मिळूनही ही कामे रखडण्याची शक्यता आहे.
यात्रा स्थळांच्या विकासांतर्गत 12 पैकी 6 कामांचे प्रस्तावच ग्रामपंचायतींकडून अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे 1 कोटी 42 लाखांपैकी या कामांसाठी 69 लाख रुपये मंजूर असूनही निधी पडून राहण्याची शक्यता आहे. हे प्रस्ताव लवकरात लवकर ग्रामपंचायतींनी सादर करावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनाच्या सूचनांना ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे निधी असूनही केवळ प्रस्तावां अभावी यात्रा स्थळांचा विकास रखडला आहे. ग्रामपंचायतींनी वेळीच कामांचे प्रस्ताव न पाठविल्यास हा निधी अखर्चिक राहून शासन दरबारी पुन्हा जमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. या विकास कामांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, मंदिर सुशोभीकरण करणे, मंदिर परिसरातील वाहनतळ विकसित करणे, मंदिर परिसराला पेवर ब्लॉक बसविणे, स्वच्छतागृह बांधणे, पाणी सुविधा देणे, भक्तनिवास बांधणे या कामांचा समावेश आहे.