मिऱ्या- काळबादेवी सागरी पुलासाठी माती परीक्षण सुरू

रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गावर काळबादेवी येथील खाडीवर पूल उभारण्यासाठी माती परीक्षण करण्यास सुरवात झाली आहे. भू तांत्रिक तपासणीसाठी बोरवेल पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमएसआरडीसी) या महामागार्चे काम हाती घेण्यात आले आहे. याला एमएसआरडीसीच्या मुंबईतील अधिकार्‍यांनी दुजोरा दिला.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यानंतर वर्षभराने एप्रिल महिन्यात भूसंपादन प्रक्रियेचेही आदेश आले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या सागरी मार्गावरील सुमारे 165 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल. या परिसरातील शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरीतील काळबादेवी खाडीचा समावेश आहे. काळबादेवी ते मिर्‍या या सुमारे 600 मीटरहून अधिक अंतर असलेल्या खाडीवरील पूल उभारण्यासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एमएसआरडीसीच्या पत्रानुसार, स्टाफ कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामध्ये भू-तांत्रिक आणि मृदा अन्वेषण केले जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुलाचे पिलर उभारण्यासाठी भूसंरचना कशी आहे हे निश्‍चित होईल.

दरम्यान, रत्नागिरी ते गणपतीपुळे या मार्गावर शिरगाव आणि परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे काळबादेवी खाडीवर पूल उभारून किनारी भागातून रस्ता बनवण्याबाबत काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही हालचाली सुरू झाल्या होत्या; परंतु याला काही कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे तो मागे पडला होता.

भाट्ये येथेही पूल

सागरी महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यात जयगड ते पावस या 20 किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. काळबादेवीबरोबरच भाट्ये येथेही पूल उभारण्यात येणार असल्याचे एमएसआरडीकडून सांगण्यात आले. येथील माती परीक्षणही लवकरच केले जाईल. शहरांना बाह्य वळण देऊन सागरी महामार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या बाहेरून हा मार्ग जाणार असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.