हिशोब न देणाऱ्या सदस्यांसह सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी गेल्या डिसेंबर महिन्यात पार पडली. या निवडणुकीच्या रिंगणात सरपंच व सदस्य पदासाठी एकूण 2 हजार 781 उमेदवार उभे होते. यातील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसह निवडणूक लढविणार्या उमेदवारांना आपल्या निवडणूक काळात झालेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 19 जानेवारी ही अखेरची मुदत दिली आहे. या मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबधित उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला तेव्हा जिह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. जिल्ह्यात डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या 222 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकूण 2 हजार 781 उमेदवार उभे होते. सरपंच व सदस्यांच्या एकूण 1 हजार 988 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात एकूण असलेल्या उमेदवारांपैकी 1 हजार 169 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते. तर प्रत्यक्ष निवडणुकीला 1 हजार 612 उमेदवार सामोरे गेले होते.
जिल्ह्यातील 507 मतदान केंद्रावर झालेले ही मतदान प्रकिया ना गोंधळ, ना गडबड अशाप्रकारे वातावरणात पार पडली होती. या निवडणूकीला सामोरे गेलेल्या 2 हजार 781 उमेदवारांना आपल्या खर्चाचा हिशोब सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. 19 जानेवारीच्या मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न करणाऱया उमेदवारांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कमल 14 (ब) नुसार अपात्रेची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबधित उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयामार्फत प्रतिज्ञापत्रासह हिशोब जमा करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी निर्देश दिले आहेत.









