नंदु केदारी; मेरीटाईम बोर्डाला दिले निवेदन
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड परिसरात आलेल्या आंग्रे पोर्ट परिसरात उतरवण्यात येणाऱ्या कोळशामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. परिसरातील विहिरींचे पाणीही प्रदूषीत झाले आहे. जनतेला वेठिस धरणाऱ्या या कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय नागरी व पर्यावरण राष्ट्रीय संस्थेचे नंदू केदारी यांनी मेरीटीईम बोर्डाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नंदू केदारी यांनी यापू्र्वी प्रदुषण नियमंत्रण मंडळाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानतंर त्यांनी आठ दिवसांनी मेरीटाईम बोर्डाला आज निवेदन दिले. जयगड येथील चाफेरी परिसरानजीक आंग्रे पोर्ट आहे. या बंदरावर कोळसा उतरवण्याचे काम सुरू आहे. ठिकाणी कोळसा उतरवण्यासाठी आवश्यक परवानगी कंपनीने घेतली आहे का? हे अद्याप स्पष्ट नाही. याशिवाय कोळशाचा साठा करून ठेवण्यासाठी बंदरावर वेगळी व्यवस्था नाही. वाऱ्यासोबत कोळशाची पावडर परिसरातील घरांमध्ये, विहीरींमध्ये आणि खाडी व समुद्रात जाऊन प्रदूषण होण्याचा
मोठा धोका आहे, अशी तक्रार केदारी यांनी केली आहे.
या शिवाय हा कोळसा व पावडर आंबा कलमांवर पडत असून झाडे मृत होण्याची भीती आहे. हवेतून कोळसा पावडर श्वसनाद्वारे शरीरात जाऊन श्वसनाचे विकार होण्याचा धोका निर्माण झालाआहे. तरी संभावित धोका लक्षात घेऊन आपण उचित कारवाई करावी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. केदारी यांनी मेरीटीईम बोर्डाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.








