आरोग्य खात्यातील भरती आता कंत्राटी पद्धतीवर

रत्नागिरी:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोग्य विभागात खासगीकरणाचा घाट घातला आहे. शासकिय  पदे मंजूर असलेल्या  रत्नागिरी जिल्ह्यातसह कोल्हापूर विभागात आता ठेकेदारी पद्धतीने आरोग्य कर्मचार्यांची भरती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. तर १९६ पदाची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून त्यासाठी  वाशी येथील मे.डी.एम.एंटरप्रायझेस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. विषेश म्हणजे रत्नागिरीतील महिला रुग्णालयातील ४९ पदे तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याने शासनाने आरोग्य विभागाचे पुर्णत:खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे का? नव्या पिढीला शासकिय नोकरी मिळणारच नाही का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणार रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सांगली,सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी आरोग्य विभाने यापुर्वी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लेखी परिक्षा  घेण्यात आली. मात्र त्या परिक्षेच्या कालावधीत गोंधळ झाल्याने ती परिक्षा रद्ध करण्यात आली होती. शासन पुन्हा परिक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवेल असे असतानाच आता कोल्हापूर विभागाने थेट कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय जाहिर करत कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे.

कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरतीमध्ये उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर १० पदे, सांगली १०पदे, शिराळा १२ पदे, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इंचलकरंजी ८६ पदे, रत्नागिरी महिला रुग्णालय ४९ पदे, सावंतवाडी रुग्णालय ४ पदे, कणकवली ४ पदे, महिला बाल रुग्णालय कुडाळ २३ अशा १९६ पदाचा समावेश आहे. जिल्हा महिला रुग्णालयाला यापुर्वी नव्या शासकिय पदाना मंजूरी मिळाली होती. मात्र शासकिय भरती न करता आता कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने इच्छूक उमेदावरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. 

शासनाने मे. डी.एम.एंटरप्राझेस वाशी, नवी मुंबई यांना कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांना कंत्राट देताना घालण्यात आलेल्या अटी व शर्तीनुसार येथे काम करणार्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोणत्याही क्षणी गदा येण्याची शक्यता आहे. या कर्मचार्यांचा शासनाशी थेट संबध नसल्याचे हि स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे याचा परिणाम रुग्ण सेवेवरही  होण्याची शक्यता आहे.

कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार्या पदामध्ये वैद्यकिय अधीकारी वगळता अन्य सर्व पदाचा समावेश आहे. अधिपरिचारीकांसह, रक्तपेढी तंत्रज्ञ,लिपीक,वाहन चालक. कक्षसेवक,औषधनिर्माण अधिकारी, मदतनिस, शिपाई या वर्ग ३ व ४ मधील कर्मचार्यांचा समावेश आहे. मात्र कंत्राटदार कंपनीसोबत केलेला करात कोणत्याही क्षणी रद्द करण्याची तरतूद ठेवण्यात आल्याने स्थानिक तरुणांना मिळणारी रोजगाराची संधी कोणत्याही क्षणी संपुष्टात येण्याची भिती निर्माण झाली आहेच. तर कोणत्याही कर्मचार्याला कामावरुन कमी करण्याचा अधिकार कंपनीकडे असल्याने नोकरीची हमी काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.