आंबा घाटात कार चारशे फूट दरीत कोसळली; सहा प्रवासी अडकल्याची भीती

एका महिलेसह तीन महिन्याच्या बालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- तीनशे फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन महिन्याच्या लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विसावा पॉइंट येथील वळणावर हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारासा घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली आहे. यात मृत्यु झालेल्या बालकाचे नाव शिवांश संतोष हरकुडे असून त्याच्या मृत्यु झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. हे दोघे सांगली येथील आहेत.

सांगली येथील डॉ. हरकुडे व डॉ. फुलारे कुटुंबीय दोन गाड्यांमधून देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे निघाले होते. कारमध्ये संतोष हरकुडे (वय ३५) पत्नी सृष्टी (वय ३२) मुलगा शिवांश (वय ३ महिने) मुलगी मन्मिता (वय ३) सागर हरकुडे, पत्नी जयश्री, डॉ. प्रताप तंबाखे (वय ७०) डॉ. संगमेश फुलारे (वय ३) पत्नी डॉ. दीप्ती (वय ३३) मुलगी आज्ञा (वय ६) वर्षे आणि तीन वर्षाचा रेहान प्रणव सुभेदार प्रवास करत होते. विसाव्या पॉइंट वरून निसर्ग सौंदर्य व फोटोग्राफी करुन यामधील एक गाडी गणपतीपुळेच्या दिशेने गेली. मागून आलेल्या कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती समजताच मुर्शी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबवली. यामधील जखमी झालेल्या तीन लहान बालकांना दरीतून काढून पुढील उपचारासाठी मलकापूरातील ग्रामीण रुग्णालय व कोल्हापूरातील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.