रत्नागिरी:- एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे, तरी एसटी कर्मचारी अजून त्या मुद्द्यावर ठाम आहेत. कामावर हजर होण्यासाठी आजचा अल्टिमेटम महामंडळाने दिला आहे. त्या कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे नोटिशीत म्हटले आहे. त्याचा फायदा घेऊन काही कर्मचारी हजर होण्यास तयार असल्याचे समजते. गेल्या पाच दिवसांमध्ये ५७ कर्मचारी हजर झाल्याची माहिती एसटी विभागाने दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचा बंद काही मिटण्याचे नाव घेईना. संपाला चार महिने होत आले तरी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांचा निर्धार पाहून शासनानेही विलीनीकरण शक्य आहे की नाही, याच्या अभ्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये अनेक कारणे देऊन एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडून कर्मचारी बंद मागे घेऊन कामावर हजर होतील, अशी अपेक्षा होती; परंतु एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. महामंडळानेदेखील आता कठोर भूमिका घेत बंदमध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्याचा (ता. १०) अल्टिमेटम दिला आहे. तशी नोटीस काढली असून, हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडत असल्याचे पाहून गेल्या पाच दिवसांमध्ये ५७ कर्मचारी हजर झाले आहेत. यामध्ये चालक १२, वाहक ८, चालक कम वाहक २१, कार्यशाळेतील ७ तर प्रशासनातील ९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एकूण कर्मचारी ३ हजार ४४७ आहेत. त्यापैकी ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर झाले आहेत. १२ कर्मचारी गैरहजर आहेत. १७१ साप्ताहिक सुटी, रजेवर आहेत तर २ हजार ५७५ कर्मचारी अजूनही गैरहजर आहेत.