रत्नागिरी:- आंबा पिक विमा कंपनी कडून कमाल तापमानाची नोंद योग्य पद्धतीने होत नाही. कातळावरील आंबा बागायतदारांना यांचा फटका बसतो. तरी यावर कृषी विभाग आणि विमा कंपनी यांनी दखल घ्यावी असा मुद्दा पंचायत समिती मासिक सभेत सदस्य सुनील नावले यांनी उचलून धरला. विमा कंपनी प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा निर्णय सभापती संजना माने यांनी घेतला.
सभापती श्रीमती माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभागृहात प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. सदस्य नावले यांनी आंबा बागायतदार यांची व्यथा मांडली. आंबा पिक विमा योजनेत तापमान नोंदणीसाठी महसूल मंडळ निहाय स्वयंचालित तापमापक बसवण्यात आली आहेत. त्यावरील नोंदिवर पिक विमा परतावा अवलंबून असतो. गेल्या काही वर्षात कातळावर असलेल्या बागायतीमध्ये कमाल तापमान असल्याने मोठ्या प्रमाणात आंबा नुकसान झाले. विमा निकषात 37.5 अंश सेल्सिअस वर पारा गेला तर परतावा ग्राह्य धरला जातो. रत्नागिरी तालुक्यातील कातळ भागात तापमान वाढून अनेकांचे नुकसान झाले, मात्र परतावा मिळाला नाही. कातळ भागातील तापमान नोंदीसाठी तापमापकच नसल्याची बाबू पुढे आली आहे. अनेक ठिकाणी डोंगर पायथ्याशी किंवा किनारी भागात तापमापक असल्याने तेथील कमाल तापमान आणि कातळावरील तापमान यात मोठा फरक असतो असे नावले यांनी मांडले. योग्य नोंदी झाल्या तरच त्याचा लाभ बागायतदार यांना मिळू शकतो. अन्यथा बागायतदार फक्त विमा हप्ते भरत राहतील आणि नुकसान झाले तरी लाभ मिळणार नाही. यासाठी विमा कंपन्यानी याची दखल घेतली पाहिजे. सभेत उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपन्या तापमापक बसवत असल्याचे उत्तर दिले. यावर सभापती संजना माने यांनी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधिशी बैठक घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.









