रत्नागिरी:- गणेश विसर्जनाला रत्नागिरीतील मांडवी आणि भाट्ये किनारी प्रचंड गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंगळवार 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर रोजी मांडवी व भाट्ये किनारी केवळ गणपती मूर्ती सोबत असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाशिवाय अन्य कोणालाही या समुद्र किनाऱ्यांवर प्रवेश दिला जाणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
रत्नागिरीत गौरी-गणपती विसर्जन सोहळा फार मोठ्या प्रमाणावर होतो. अनंत चतुदर्शीला देखील मांडवी आणि भाट्ये किनाऱ्यावर गणपती मूर्ती विसर्जन करणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. विसर्जन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या दोन्ही किनाऱ्यांवर गर्दी करतात. नुकत्याच झालेल्या दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी मांडवी किनारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी विनाकारण मांडवीत जाणाऱ्यांना हटकल्याने नागरिकांनी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने विसर्जनासाठी नवी नियमावली जाहीर करत मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर जाण्यास 14 व 19 सप्टेंबर रोजी मनाई आदेश काढला आहे.
14 व 19 सप्टेंबर रोजी विसर्जन ठिकाणी गणपती मुर्ती घेऊन येणाऱ्या लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. भाट्ये व मांडवी येथे गणपती विसर्जनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी जाण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 4 ) , 43 नुसार मनाई आदेश निर्गमित करण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 4 ) नुसार – पोट – कलम ( 1 ) अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.









